कोल्हापूर – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षामुळे स्थगित होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्यात अडथळा येत असल्याची खंत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी प्रयत्न करत आहे. सभापती महोदयांनी तीन वेळा मला प्रश्न मांडण्यासाठी वेळदेखील दिली. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षात काही विषयांवर असमन्वय असल्याने त्याचे पडसाद सभागृहात उमटत आहेत.
त्यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित होत आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप संसदेत मांडता आलेला नाही. इतरही अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहे. विरोधकांचा ज्यावर आक्षेप आहे, त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सामंजस्याने एकत्रित बसून विषय सोडवावेत. मात्र त्यासाठी संसदेच्या कामकाजात बाधा आणू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.