वेगवेगळ्या कारणांतून सुनावणी नाही
पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळावर शेतकऱ्यांकडून सुमारे दीड हजार हरकती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) नोंदविण्यात आल्या आहेत. मागील वर्षांपूर्वी यावर हरकती नोंदविण्यात आल्या. मात्र, शासनाकडून या हरकतींवर अद्यापही सुनावणी घेण्यात आलेली नाही. विधानसभा निवडणुका, सरकार स्थापनेस झालेला विलंब, करोनाचे संकट आणि सरकारचे विमानतळाबाबत धोरण स्पष्ट नसल्याने हरकतींवर सुनावणी घेण्यास एमएडीसीकडून हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे.
पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या “छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर करण्यात आल्यानंतर या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचा उद्देश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) जाहीर केला.
त्यानुसार पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या गावातील हद्दीचे नकाशे जाहीर करण्यात आले. यावर शेतकऱ्यांनी पुरंदर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई येथील एमएडीसीचे कार्यालय याठिकाणी हरकती नोंदविल्या आहेत. ऑगस्ट 2019 मध्ये हरकती घेण्याची असलेली मुदत समाप्त झाली. मात्र, त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुका यामुळे सुनावणीची प्रक्रिया एमएडीसीकडून पुढे ढकलण्यात आली.