तब्बल 450 पेक्षा अधिक भाविक, पुजाऱ्यांचे जिल्हा न्यायाधीशांना निवेदन
देवसंस्थान निर्णय मागे घेणार की कायम करणार याकडे लक्ष
समाधीची झीज बंद व्हावी म्हणून घेतला होता निर्णय
आळंदी (वार्ताहर) – माउलींच्या संजीवन समाधीवरील महापूजा बंद करण्याचा निर्णय श्री ज्ञानेश्वर महाराज देवसंस्थानने प्रायोगिक तत्वावर 27 डिसेंबर 2019 रोजी घेतला होता. मात्र, या निर्णयाला विरोध करणाऱ्या तब्बल 450 पेक्षा अधिक भाविक, पुजाऱ्यांनी लेखी अक्षेप घेतला आहे. तर याबाबत जिल्हा न्यायाधीश, विधी व न्यायमंत्र्यांकडे याबाबत निवेदन दिले आहे. त्यामुळे देवसंस्थान हा निर्णय मागे घेणार की कायम करणार हे पाहणे उत्सुक्याचे आहे.
आळंदी देवस्थानमधे माउलींच्या समाधीवरिल पहाटेच्या पवमान अभिषेकानंतर सकाळी अकरा वाजेपर्यंत
चालणाऱ्या महापूजा अनेक वर्षे सुरू असल्याने समाधीची झीज होत होती. समाधीची झीज बंद व्हावी आणि दर्शनाच्या रांगेतील भाविकांच्या दर्शनाची गैरसोय होवू नये यासाठी देवस्थानच्या विश्वस्त समितीने गेली काही महिने पूजेबाबत पाहणी केली. मंदिरातील सीसीटीव्ही तपासले. याबाबत धर्मदाय आयुक्तांनीही यापूर्वीच देवस्थानला महापूजेत
होणाऱ्या गैरसोयीबाबत आणि गर्दीचे नियोजन करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यास कळविले.
पुरातत्व विभागाने पाहणी करून समाधीच्या होत असलेल्या झीजबात स्पष्ट अहवालही दिला होता. याबाबत देवस्थानच्या पुजारी, मानकरी आणि वारकरी संप्रदायातील प्रमुख घटकांबरोबरच अन्य देवस्थानमधे कशा पद्धतीने पुजा केल्या जातात याचीही चर्चा व माहिती घेवून देवस्थानने समाधीचे आणि परंपरांचे हित जोपासण्यासाठी निर्णय घेतला होता. पुजांच्या संख्यांचा अतिरेक आणि समाधीचे पावित्र्य राखणे याचा संबंध आल्यामुळे हा निर्णय घेण्याचा विचार केला अशी बाजू देवस्थानकडून मांडण्यात आली होती. त्यानंतर ज्यांचा या निर्णयाला विरोध असेल त्यांनी लेखी स्वरूपात तक्रारी सूचना करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदत देवस्थानकडून दिली होती.
…त्यामुळे भाविकांनी केली मागणी
चलपादुकांवर सुरू करण्याच्या देवसंस्थानच्या निर्णयास सुरूवातीला पुजाऱ्यांनी असहमती दर्शिवली; मात्र दुसऱ्याच दिवशी चलपादुकांवपूजा करण्यास सुरू केले. अभिषेक पूजा सुरू करण्याचे समर्थन करताना भाविकांनी सांगितले की, समाधीवरिल पुजेमुळे आत्मिक समाधान मिळते.चलपादुकांवर पूजा केल्याने श्रद्धेस तडा जातो. यामुळे अभिषेक पुन्हा सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली. आता जिल्हा न्यायाधीश आणि देवस्थान पुढे काय निर्णय घेणार याची उत्सुकता भाविकांमध्ये आहे.
समाधी दर्शनात भाविकांची वाढ
ज्यावेळी समाधीवर महापूजा सुरू होत्या त्यावेळी पहाटे 6 ते 11 यावेळेत 3 ते 4 हजार भाविक दर्शन घेत होते. तर आता समाधीवरील महापूजा बंद केल्यानंतर पहाटे 6 ते 11 यावेळेत 7 ते 8 हजार भाविक यावेळी दर्शन घेत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले आहे. तर समाधीवरील महापूजा बंदीच्या निर्णयाचे काही भाविकांनी स्वागत केले असून त्याबाबत लेखी प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल संस्थान कमिटी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांनी सांगितले.