– स्वाती दाढे, पुणे
भारतीय कंठसंगीतामधील अत्यंत गाजलेली दुकल म्हणजे पंडीत राजन-साजन मिश्र. बनारस घराण्याच्या या जोडीने शास्त्रीय संगीतातला सहगायनाचा प्रकार लोकप्रिय तर केलाच शिवाय त्यामध्ये अनेक प्रयोगही केले. पुण्यामध्येही “सवाई’सह विविध संगीत महोत्सवामध्ये त्यांनी आपली अदाकारी पेश केली होती. यापैकी पंडीत राजन यांचे नुकतेच कोविडमुळे निधन झाले आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील एक तारा निखळला. एका संगीत रसिकाच्या भूमिकेतून दै. प्रभातच्या वाचक स्वाती दाढे यांनी राजन-साजन यांच्या मैफिलींना उजाळा दिला आहे…
महाविद्यालयीन जीवनात असताना गॅज्युएशनच्या वेळी आम्ही तिघी मैत्रिणी एकेकीच्या घरी अभ्यासाला जमायचो. बॅकग्राउंडला विविधभारती चालू असायचेच. दुपारी अडीच-पावणे तीनला शास्त्रीय संगीतावर आधारित एक कार्यक्रम असायचा. शास्त्रीय संगीतातल्या एका रागाची ओळख, एक चीज आणि त्यावर आधारित सिनेमातील एखादे गाणे – असा तो 15 मिनिटांचा कार्यक्रम. असेच एक दिवस “सूरसंगम’ सिनेमातील “आये सूर के पंछी आये…हे अप्रतिम गाणे लागले आणि तो भरदार आवाज, दमदार, जोरकस ताना आणि सुरेल सादरीकरण ऐकताना आम्ही जाम भारावून गेलो. “सुरांचे पंछी’ खरोखर डोळ्यांपुढे उड़त होते.
गायकाचे नाव कळले, पंडित राजन मिश्र. मग “सूरसंगम’ची कैसेट मिळवून आम्ही त्या सर्वच गाण्यांची पारायणे केली; सिनेमाही बघितला. गिरीश कर्नाड आणि जयाप्रदा यांच्या अभिनयाबद्दल काय बोलावे? “जय शिवशंकर जय करुणाकर…’ हे गीतही अतिशय जोरकस आणि आर्त-भक्तीपूर्ण. आणि मग गायक पंडित राजन-साजन मिश्र ही जोडनावे मनात कोरली गेली.
त्यानंतर जगप्रसिद्ध असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवातचार ते पाच वेळा त्यांची सहगायकी ऐकता आली आणि आणि मन आनंद-आनंद झाले. त्यांचे प्रसन्न, सात्विक दर्शन, शुभ्र किंवा एकसारखा वेश, रसिकांना आपलंसं करणारं हास्य, तन्मय आणि परिपूर्ण गायन, एकमेकांकड़े बघत दाद देणे, श्रोत्यांना मान देत तृप्त करणे… फार फार आवडले.
बनारस घराण्याच्या तेजस्वी सुरांमध्ये ते रसिकांना चिंब भिजवत असत. दुसरे काही मग ऐकूच येत नाही, मनात तो ख्याल रुणझुणत राहतो. संस्कृत श्लोकांमध्ये सज्जनांचे जे वर्णन असते, ते या दोघांना बरोबर लागू आहे, असे त्यांच्याकडे बघून वाटते. पुढे त्यांच्या मुलांचेही असेच सह-गायन ऐकले आणि त्यांची परंपरा पुढेही चालू राहणार, याचा खूप आनंद झाला.
वर्ष 2010 मध्ये एक दिवस गांधर्व महाविद्यालयात राजनजींच्या षष्ट्यब्दी पदार्पणानिमित्त त्यांचे शास्त्रीय गायन असल्याचे कळले. त्या “विष्णू विनायक स्वरमंदिरा’त अगदी व्यासपीठाजवळून ते स्वर्गीय सहगायन ऐकले. ऐकले म्हणण्यापेक्षा पाहिले, अनुभवले. कारण मी बराच वेळ त्यांचे ट्यूनिंग, हावभाव, एकरूपता, साहचर्यच बघत होते. जणू देह दोन पण आत्मा एक, आणि तोही स्वरांमध्ये रंगलेला. गायन आणि सत्कार वगैरे कार्यक्रम संपल्यावर मी त्यांची सही घेतली आणि फोटोही काढले. फोटो नाही सापडले, पण सह्यांची वही जपून ठेवली आहे.
या दोघा भावांचे हे अतूट अद्वैत एकमेव असेच आहे. त्यांनी नेहमीच सहगायन केले. दोघांचे विचार, ट्यूनिंग किती मिळतेजुळते असावे, याचे खूपच विलोभनीय प्रत्यंतर या सादरीकरणातून येत असे. एक दुसऱ्याला पुढे न्यायला प्रोत्साहन देणार, दाद देणार, सावरुन घेणार. हेच खरे सहोदरत्त्व; हे बंधुत्त्व आजच्या काळात अति दुर्मिळ. आपण नात्यात, आजूबाजूला नेहमी दोन भावांमध्ये दुरावा, वाद, विसंगती, गैरसमज बघतो, अनुभवतो. त्यापुढे या दोन भावांमधील आपुलकी, प्रेम, सदैव एकत्र असणे, एकमेकांना बरोबर घेऊन शास्त्रीय संगीताच्या सुरेल मैफली संपन्न करणे… हे साहचर्य अनोखे, आदर्श, आणि तुमच्या-आमच्यासारख्याला तर प्रेरणादायक नक्कीच आहे.
उच्च सांगीतिक ज्ञानाइतकेच राजन-साजन मिश्र यांच्यातील हे बंधुत्व मला फार महत्वाचे आणि भारावून टाकणारे, प्रभावित करणारे वाटते. संगीत हे विश्वव्यापी आहे. त्याची भाषा कोणालाही समजते, डोलायला लावते, मंत्रमुग्ध करते. आणि हे या मिश्र बंधूंच्या बाबतीत पूर्ण खरे आहे. देश-विदेशात त्यांनी हिंदुस्तानी संगीत कानोकानी पोचवले आणि दैवी, समृद्ध संगीतकलेची अखंड सेवा केली.
पंडित राजन यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनानंतरही ही अभेद्य जोडनावे गान-रसिकांच्या मनामनात, ओठांतून एकत्रच उच्चारली जातील, अशी मला पूर्ण खात्री आहे. आपल्या अलौकिक गायनरूपात पंडित राजनजी अमर आहेत.
– स्वाती दाढे, पुणे