मुंबई – आताच्या सरकारमुळे म्हणजेच, महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींना आरक्षण मिळू शकत नाही, असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एवढेच नाहीतर हा सरकारचा डाव असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
भाजप ओबीसी मोर्चा संघटनेच्या ओबीसी जागर अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या इतिसात पहिल्यांदा एवढे ओबीसी मंत्री बनवणारे कोण असतील? ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आपण म्हणायचो बहुजनांचे राज्य येणार, ते आज मोदींचे मंत्रिमंडळ पाहिल्यावर कळते. ओबीसींचा खरा पक्ष कोणता? तर तो भाजप आहे.
ओबीसींना संवैधानिक दर्जा मिळवून देण्याचे काम भाजपने केले आहे. आज केंद्र सरकराच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी खूप योजना सुरु झाल्या आहेत. ओबीसी समाजाला स्थान देण्यासाठी महामंडळासाठी निधी दिला. सर्व समाजाला पुढे घेऊन जात नाही तोपर्यंत आपण देशाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही, हे आमच्या पक्षाचं ब्रीद वाक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.