मुंबई : राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी येत्या १८ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. या इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय घेतल्या जात असून यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळेच ओबीसींच राजकीय आरक्षण संपल होत, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
”नगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या ओबीसीच्या आरक्षणाशिवाय नको अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली होती. खरं तर भाजपामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले होते. आता योगायोगाने राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ज्या प्रकारे मध्यप्रदेशला मदत केली होती. त्यानंतर तिथे ओबीसींना आरक्षण मिळाले आणि त्यानुसार मध्यप्रदेशमध्ये निवडणुका होत आहे. तशीच मदत महाराष्ट्राला करावी, महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानंतर निवडणुका घ्याव्या. अशी आमची मागणी आहे”, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात सत्तांतर होताच पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ नयेत अशी मागणी सर्वच पक्षांचे नेते करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार असतानाच राज्य निवडणूक आयोगाने ९६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.