मुंबई : मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सोबतच ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर शिवराज सरकारने न्यायालयांत पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाचा निर्णय आला आहे. यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली. मध्यप्रदेशने पहिला निर्णय विरोधात आल्यानंतर स्थानिक पातळीवर डेटा गोळा केला. मात्र महाराष्ट्रातील मंत्री फक्त मोर्चे काढत बसले. काहीही केलं नाही. केवळ राजकारण झालं. मुख्यमंत्र्यांनी देखील यात लक्ष घातल नाही. त्यामुळे कोणताही इम्परिक डेटा तयार झाला नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. आम्हाला चुकीचं म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अंजन घातल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.
फडणवीस पुढं म्हणाले की, सरकारच्या नाकर्तेपणामुळे OBC ला आरक्षण मिळालं नाही. यासोबतच जो पर्यंत OBC आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते माध्यमांशी बोलत होते.