मंचर -सेंट्रल किचनमध्ये आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने पोैष्टिक, समतोल, चांगला आहार बनवला जाईल. एकूण पाच हजार विद्यार्थ्यांसाठी सकाळचा नाष्टा, नंतर जेवण आणि संध्याकाळचे जेवण बनवण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. हे जेवण बनवून शाळा व वसतिगृहांवर पुरवठा करण्याचे काम नारी शक्ती या संस्थेला देण्यात आले आहे.
या किचनचे काम जवळ जवळ पूर्ण होत असून, चालू शैक्षणिक वर्षापासून येथून जेवण देता येऊ शकते. या किचनमुळे विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या तक्रारी बंद होऊन मुलांना सकस आहार मिळेल असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव-कोटमदरा येथे निर्माण होत असलेल्या सेंट्रल किचनच्या कामाची पाहणी शनिवारी (दि. 23) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते.
आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यांतील आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे व आश्रमशाळांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी या किचनची निर्मिती केली जात आहे. या तीन तालुक्यांत मोठे आदिवासी क्षेत्र आहे. मुलांसाठी ठिकठिकाणी आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत. या आश्रमशाळा व वसतिगृहांना सध्या ठेकेदार पद्धतीने जेवण व नाष्टा पुरवण्यात येत आहे. यामध्ये मुलांना सकस व पौष्टिक जेवण मिळत नाही, अशा तक्रारी होतात.
यासाठी एकाच ठिकाणी सेंट्रल किचनमध्ये सर्व मुलांचे जेवण तयार करून हे जेवण गाड्यांनी प्रत्येक आश्रमशाळेवर व वसतिगृहावर पुरवण्याची योजना आयुष प्रसाद एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असताना आखली आणि मंजुर करून घेतली होती, त्या कामाची पाहणी केली.