नवी दिल्ली – समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी योग्य पोषण आहारही तितकाच महत्त्वाचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कुपोषण नाहीसे करण्यासाठी योग्य पोषण आहाराचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी सरकार जनजागृतीचा कार्यक्रम देशभर हाती घेत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
आज सोमवारपासून सरकारच्या याच प्रयत्नाचा भाग म्हणून पोषण माह उपक्रम सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या संदेशात मोदींनी ही बाब नमूद केली आहे. योग्य पोषण आहाराच्या पद्धतीचा युवक व महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतीय खाद्य परंपरेत मोठे पोषण मूल्य असलेले अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. लोकांनी ते पदार्थ आणि त्यांची रेसिपी माय गव्हर्नमेंट या साईटवर टाकावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी लेट्स बी लोकल फॉर पोषण असा नाराही दिला आहे.
या व्हिडिओ संदेशाबरोबरच मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमाच्या काही भागाचे रेकॉर्डिंगही सादर केले असून त्यात त्यांनी लोकांच्या विकासात पोषण आहाराचे किती महत्त्व आहे याचा उल्लेख केला होता. देशात कुपोषणाच्या विरोधात पोषण आहाराची जागृती करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण माह साजरा केला जातो.