आंबेगाव तालुक्यात 24 केंद्रांतर्गत 232 शाळा करोनामुळे बंद
मंचर- जिल्हा परिषदांच्या शाळांना करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनिश्तिच काळासाठी सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांना दिला जाणारा पोषण आहार गरीब व गरजू नागरिकांसाठी देण्यात यावा असे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत, त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील गरीब आणि गरजूंना या धान्याचे वाटप लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले आणि मंचर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रवीण मोरडे यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सरकारने सुटी जाहीर केली आहे. तालुक्यात 24 केंद्रांतर्गत 232 शाळा आहेत. 232 शाळांमध्ये अंदाजे 40 ते 50 टन पोषण आहार पडून आहे.पहिली ते चौथीच्या मुलांना दररोज प्रत्येकी 100 ग्रॅमप्रमाणे पटसंख्येनुसार अन्नधान्य मिळते, तसेच पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना रोज प्रत्येकी 150 ग्रॅम प्रमाणे अन्नधान्य मिळते. धान्यांमध्ये तांदूळ, मुगडाळ, मसूरडाळ, चवळी यांचा समावेश असतो.
तालुक्यात असणाऱ्या 232 शाळांमध्ये पटसंख्येनुसार अन्नधान्यसाठा येत असतो. हे अन्नधान्य शालेय सुटीमुळे कीड लागून वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय आदेशानुसार अन्नधान्यसाठा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वाड्या-वस्त्यांवरील गोरगरिबांना हे धान्य त्वरीत द्यावे, अशी मागणी कळंब येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाराम भालेराव यांनी केली आहे.