अती गर्दी करणे, मास्क न घालने पडतेय महागात
पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून सार्वजनिक वाहतूक सेवा बंद होती. मात्र, आता परत टाळेबंदीच्या अटी टप्प्याटप्याने शिथिल केल्या जात असल्याने सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्वपदावर येत आहे. याचा परिणाम करोना विषाणू संक्रमणात होत आहे. प्रशासनाकडून प्रवासादरम्यान घ्यावयाच्या काळजीसाठी एक नियमावली तयार करण्यात आली. मात्र, काटेकोरपणे पालन केले जात नसल्याने करोना संक्रमणास सार्वजनिक वाहतूक पोषक ठरत आहे.
कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मार्च महिन्यात शासनाने टाळेबंदीची घोषणा करण्यात आल्याने गेल्या पाच महिन्यांपर्यंत राज्यातील व देशातील महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होती. यात, रेल्वे, विमान आणि एसटी, पीएमपी वाहने बंद झाल्याने राज्यातील महानगरांतील कामगारांना आपल्या गावी जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. तर, काहींवर यामुळे उपासमारीची वेळ आली होती.
तब्बल पाच महिन्यानंतर टाळेबंदीच्या अटी शिथिल करण्यात आल्याने पुन्हा सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपी, आणि खासगी वाहतूक सुरू करण्यात आल्याने मोठी गर्दी होत आहे. यामार्फत करोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुमारे 1500 तर, पिंपरी-चिंचवड शहरात 1 हजार रुग्ण आढळत आहेत. यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा आकडा चिंताजनक असून, रुग्णांना रुग्णालयात दाखल करायला आणि रुग्णसेवा द्यायला डॉक्टरांची व प्रशासनाची दमछाक होत आहे.
नुकतीच महाराष्ट्र परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या बसमध्ये पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करायला परवानगी दिली आहे. तर, रेल्वेच्या काही गाड्या सुरू करण्यात आल्या असून राज्यातील रेल्वे स्थानकावरून प्रवास करण्याची राज्यशासनाकडून मुभा मिळाली. त्यात, पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) 25 टक्के संचलनात असलेल्या बसमध्ये गर्दी दिसू लागल्याने नागरिकांचा थेट संपर्क वाढत आहे. ही धोक्याची घंटा असून करोना संक्रमणास कारणीभूत ठरत आहे. त्यात, करोनाबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असल्याने मास्कचा वापर काटेकोरपणे होत नाही या गोष्टीमुळे सार्वजनिक वाहतूक करणारी पीएमपी, एस.टी, रिक्षा आणि खासगी वाहने करोना संक्रमणाचे व्हॉट्स पॉट ठरत आहेत.