पाटणा – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची तुरूंगातून सुटका करावी या मागणीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना असंख्य टपाल पत्रं पाठवली जाणार आहेत. ती अनोखी मोहीम लालूंचे थोरले पुत्र तेजप्रताप यादव यांनी हाती घेतली आहे.
तेजप्रताप यांनी अनेक समर्थकांसमवेत मुख्य टपाल कार्यालय गाठले. त्यांच्या समवेत अनेक टपाल पत्रं होती. त्यांचा उल्लेख तेजप्रताप यांनी आझादीपत्र म्हणून केला. जनतेचा आवाज राष्ट्रपती ऐकतील अशी आशा वाटते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. चारा घोटाळ्याशी संबंधित विविध प्रकरणांत दोषी ठरवत लालूंना न्यायालयाने तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्यांना झारखंडमधील तुरूंगात ठेवण्यात आले.
प्रकृती ढासळल्याने लालूंना उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आले असले तरी त्यांची कोठडी कायम आहे. सर्व प्रकरणांत जामीन न मिळाल्याने त्यांची तुरूंगातून औपचारिक सुटका होऊ शकलेली नाही. त्यापार्श्वभूमीवर, तेजप्रताप यांनी पत्रमोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, तेजप्रताप यांच्या कृतीवर भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी टीकास्त्र सोडले. प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर लालूंना शिक्षा झाली. आता त्यांचे पुत्र दोन लाख पत्रांची मोहीम हाती घेऊन न्यायव्यवस्थेबाबत अविश्वास निर्माण करू पाहत आहेत, असा आरोप सुशील यांनी केला.