नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. रविवारी संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल सरकार खोटं बोलण्यामध्ये नंबर एक असल्याचे म्हंटले आहे. ते राजधानीतील रोहतास नगर येथे जाहीर सभेला संबोधित करीत होते.
ते म्हणाले की, देशभरात वेगवेगळे सर्वेक्षण झाले आहेत, शुद्ध पिण्याच्या पाण्यात एक सरकार प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसरे सरकार रस्ते विकासात प्रथम क्रमांकावर आहे.पण यात कुठेही केजरीवाल सरकारचा नंबर लागत नाही केजरीवाल सरकारचा फक्त एकाच ठिकाणी नंबर एक येतो आणि ते म्हणजे खोटे बोलण्यामध्ये.
ते पुढे म्हणाले, केजरीवाल सरकारने पाच वर्षे खोटी आश्वासने दिली, त्यांना आपल्या आश्वासनांची आठवण आता येणार नाही, परंतु मी त्यांच्या खोट्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी आलो आहे अशा केजरीवाल सरकारवर त्यांनी तोफ डागली.
शाह म्हणाले, केजरीवाल सरकारने 15 लाख सीसीटीव्ही बसवणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यातील फक्त एक लाख सीसीटीव्ही मला दाखवावे, सत्तेत आल्यास सरकारी बंगला घेणार नाही, असे केजरीवाल म्हणाले होते. परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी सरकारी बंगला घेतला. सरकारी गाडीत 5 वर्षे प्रवास केला.