भुवनेश्वर – “फणी’चक्रिवादळामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 29 वर पोहोचली आहे. य चक्रिवादळामुळे ओडिशामध्ये गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच झाडे कोसळणे आणि घरांचे नुकसान होण्यामुळे शेकडो जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. पाणी आणि वीजपुरवठा खंडीत झाला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
ओडिशामध्ये वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. खुर्दामधील नागरिकांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तेथील अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या नागरिकांना 50 किलो तांदूळ, रोख 2 हजार रुपये आणि तात्पुरत्या आश्रयासाठी पॉलिथीनचे कापड देण्यात येणार आहे. त्यापेक्षा कमी नुकसान झालेल्या कुटुंबांना मासिक कोट्याइतका तांदूळ, रोख 1 हजार रुपये आणि पॉलिथीनचे कापड दिले जाणार आहे. कटक, केंद्रपारा आणि जगत्सिंघपूर येथील नागरिकांनाही तांदूळ, रोख मदत दिली जाणार आहे. एकूण मृत्यूमुखी पडलेल्या 29 पैकी 21 जण ओडिशामधील पुरी येथील यात्रेकरू आहेत. या वादळामुळे येथील घरे जमिनदोस्त झाली, शेकडो झाडे, मोबाईलचे टॉवर आणि वीजेचे खांबही उखडून पडले आहेत.
पूर्व रेल्वेची सेवा रविवारपासून अंशतः सुरळीत सुरू झली. भुवनेश्वर – तिरुपती एक्सप्रेस आणि विशाखापट्टणम इंटरसिटी एक्सप्रेस वगळता बहुतेक अन्य रेल्वेगाड्या पुन्हा सुरु झाल्या आहेत.