आण्विक खनिजे संचालनालयाला उपराष्ट्रपतींनी दिली भेट
नवी दिल्ली – अणुऊर्जा हरितगृह वायू उत्सर्जन बऱ्याच प्रमाणात कमी करु शकते तसेच देशाची विजेची वाढती गरज पूर्ण करण्याची क्षमता तिच्यात आहे, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. आण्विक खनिजे संचालनालयाच्या शोध आणि संशोधन कार्याला 70 वर्ष झाल्यानिमित्त हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अणुऊर्जा हा ऊर्जेचा भरवशाचा आणि सुरक्षित पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. मानव आणि सामाजिक विकासासाठी भारत आण्विक शक्ती वापरत असल्याचे ते म्हणाले.
महत्वाची खनिजे शोधण्यासाठी संचालनालय करत असलेल्या प्रयत्नांचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. देशात तीन लाख टनांहून अधिक युरेनिअम ऑक्साइडचे साठे आणि जवळपास 1200 दशलक्ष टनांहून अधिक किनारी वाळू खनिज स्रोत उपलब्ध आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले. संचालनालयाच्या प्रयत्नांमुळे 60 वर्षामध्ये ज्ञात यूरेनिअम स्रोतांमध्ये पडलेली जवळपास 1 लाख टनांची भर आणि गेल्या 10 वर्षात पडलेली सुमारे दोन लाख टनांची भर कौतुकास्पद असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.
कडप्पा खोऱ्यासह देशाच्या विविध भागात संचालनालयाकडून सुरु असलेल्या शोधाबाबत विश्वास व्यक्त करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, यामुळे अधिकाअधिक युरेनिअम उपलब्ध होऊ शकेल. देशात ऊर्जेची मागणी वाढत जाणार असून अणुऊर्जेची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. स्रोतांचा पुरेपूर वापर करण्यासाठी नवे आणि अधिक सक्षम तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.