पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या 13 डिसेंबरला राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) घेण्यात येणार आहे. 337 केंद्रांवर 94 हजार 238 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
इयत्ता दहावीच्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे. या सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी व त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.
राज्य व राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा होणार आहे. शासनमान्य शाळेतील इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी परीक्षेस बसता येते. शाळांना परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर शाळा लॉगिनमध्ये 23 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून दिली आहेत.
प्रवेशपत्रे विद्यार्थ्यास काढून देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्राबाबत अडचण असल्यास किंवा काही दुरुस्ती असल्यास संबंधित परीक्षा केंद्र संचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिल्या.