नवी दिल्ली ( Indian national flag SOP in New Delhi ) – आपल्या देशाचा ध्वज हा एकता, शांतता, समृद्धी आणि विकासाचे प्रतिक आहे. राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी रोज राष्ट्रध्वज फडकवण्यात येतात. अनेकदा वाऱ्याच्या झोतामुळे लहरणाऱ्या राष्ट्रध्वजाकडे नागरिक पहात बसतात, फोटो काढतात. हे राष्ट्रध्वज खराब स्थितीत असू नयेत, स्वच्छ आणि नीटनेटके असावेत याची जबाबदारी दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्लूडी) आहे. राष्ट्रध्वजांच्या योग्य देखभालीसाठी आता एसओपी जारी करण्याचे काम या विभागाने हाती घेतले आहे.
15 दिवसांनी राष्ट्रध्वज बदलण्याच्या सूचना
राष्ट्रध्वजाची योग्य देखभाल होण्याच्या दृष्टीने दर 15 दिवसांनी राष्ट्रध्वज बदलण्यात यावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येतो त्याठिकाणी आता आणखी एक राष्ट्रध्वज हाताशी ठेवण्यात येईल. जेणेकरून एक ध्वज 15 दिवसांनी धुण्यासाठी आणि इस्त्रीसाठी गेल्यावर दुसरा वापरता येईल. दर 15 दिवसांनी राष्ट्रध्वज धुऊन त्याला इस्त्री करण्यात येईल. जेणेकरून ध्वज स्वच्छ आणि नीटनेटका दिसेल.
त्याचबरोबर प्रत्येक विभागात तिरंगा समित्या नेमण्यात येणार असून त्यांच्याकडे देखभालीवर लक्ष देण्याचे काम असेल. जोरदार वारे-वादळाच्या परिस्थितीत राष्ट्रध्वजाचे नुकसान होते. अशावेळी राष्ट्रध्वज तात्काळ बदलण्याची जबाबदारी या समितीवर असेल.