पुणे – “महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केली जाते. मात्र, बदलत्या स्थितीमुळे ही प्रथा सुरू ठेवणे पर्यावरणीयदृष्ट्या घातक आहे. दुर्मिळ होत असलेल्या आपट्याची जास्तीत जास्त रोपे तयार करून शेत, परसबागा, टेकड्यांवर त्यांची लागवड करत दसरा साजरा केला पाहिजे,’ असे मत पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
याबाबत पर्यावरण अभ्यासक प्रिया फुलंब्रीकर म्हणाल्या, “दसरा म्हणजेच विजयादशमी (अश्विन शुद्ध दशमी) हा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी सोनं म्हणून आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केली जाते. पूर्वी भारतात विपुल वृक्षसंपदा आणि लोकसंख्या मर्यादित होती. त्यामुळे आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केल्यामुळे निसर्गाचे फारसे नुकसान होत नव्हते. परंतु सध्या ही प्रथा सुरू ठेवणे पर्यावरणीयदृष्ट्या घातक आहे. ‘
“वाढलेली लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि प्रदूषणाचा भस्मासूर यामुळे आपटा ही वनस्पती दिवसेंदिवस दुर्मीळ होत आहे. अनेक पक्ष्यांचे विशेषत: फुलपाखरांचा अधिवास असणाऱ्या या देशी वृक्षाचे रक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळेच दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने तोडण्याऐवजी त्यांच्या लागवडीचे उपक्रम हाती घ्यावेत,’ असे आवाहनदेखील फुलंब्रीकर यांनी केले आहे.