परदेशातला नवरा हवा, अशी अनेक मुलींची इच्छा असते. मुलीच्या आईवडिलांनाही परदेशातला जावई मिळाला की भरून पावल्यासारखे वाटते. अशा लग्नांमध्ये फसवणुकीचे अनेक प्रकार घडले असूनसुद्धा ही “क्रेझ’ कायम असणे अधिक चिंताजनक आहे. आनंदाच्या भरात परदेशातल्या स्थळाची व्यवस्थित चौकशीही केली जात नाही. परदेशी संस्कृती स्वीकारूनसुद्धा आपली पाळेमुळे भारतीय संस्कृतीत रुजलेली आहेत, असे म्हणणारे मुलाचे आईवडीलसुद्धा आपल्या सुनेच्या आत्मसन्मानाची फिकीर करत नाहीत.
अनिवासी नवरदेव रडारवर! (भाग-१)
लग्नानंतर अनेक युवती भारतात राहून आपल्या पतीची प्रतीक्षा करीत असतात; परंतु त्यांचे पती त्यांची दखलही घेत नाहीत. त्यामुळेच अशा व्यक्तींशी लग्न करणाऱ्या अनेक मुलींच्या नशिबी एकटेपणाच्या यातना आणि छळ अशा गोष्टी त्यांची इच्छा नसतानाही आल्या आहेत. अशा प्रकरणांची संख्या झपाट्याने वाढत असून, ते अधिक चिंताजनक आहे. पंजाबच नव्हे तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये अशा अनेक मुली आहेत, ज्यांची लग्ने तर झाली आहेत; परंतु त्या आपल्या पतीच्या घरी जाण्याची वाट पाहात आहेत. आजमितीस परिस्थिती अशी आहे की, विवाहानंतर एनआरआय पतीने आपल्या पत्नीला सोडून दिल्याच्या किंवा तिचा छळ केल्याच्या दिवसाकाठी सरासरी तीन तक्रारी परराष्ट्र मंत्रालयाकडे येत आहेत. याच कारणामुळे अशा प्रकरणांत योग्य कारवाई करता यावी म्हणून सरकारने काही दिवसांपूर्वी फौजदारी प्रक्रिया संहितेत (सीआरपीसी) बदल करण्याचा विचारही व्यक्त केला होता. या वर्षाच्या प्रारंभीच परराष्ट्र मंत्रालयाने गृह मंत्रालयाला आणि कायदा मंत्रालयाला सांगितले होते की, न्यायालयाच्या समन्सकडे कानाडोळा करणाऱ्या एनआरआय नवरदेवांना “फरार आरोपी’ जाहीर करता यावे यासाठी काय करता येईल, यासंबंधी विचार करावा. अशा प्रकरणांत तक्रार दाखल होऊन न्यायालयीन कार्यवाही सुरू झाल्यानंतरसुद्धा एनआरआय पती कायद्याच्या तावडीत सापडत नाहीत. दूरदेशी स्थायिक झालेले हे लोक स्वतःला सुरक्षित मानू लागतात.
काही प्रकरणांत तर असे समोर आले आहे की, लग्न करून परदेशी परतलेल्या पतीचा पत्ताच चुकीचा असल्याचे लक्षात येते. अशा प्रकरणांमध्ये तक्रार दाखल होऊन आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊनसुद्धा काहीच निष्कर्ष निघू शकत नाही. अशा प्रकारची फसवणूक आणि छळ थांबविण्यासाठी केंद्र सरकारने गेल्याच वर्षी अशा लग्नांची नोंदणी करण्याचे पाऊल उचलले. वस्तुतः एनआरआय युवकांसंबंधी अधिक माहिती उपलब्ध नसल्यामुळेच अशी लग्ने होतात. अनेकदा नवरदेव किंवा त्याचे कुटुंबीय खूप कमी अवधीसाठी भारतात येतात आणि त्यामुळेच घाईगडबडीने लग्ने ठरविली जातात. परंतु भविष्यात संबंधित युवतीला अनेक प्रकारच्या अवहेलनांना सामोरे जावे लागते. लग्नानंतर वधूला भारतातच सोडून परदेशी जाण्याबरोबरच अशा प्रकारच्या विवाहांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आल्याच्या तक्रारी येत असतात.
उदाहरणार्थ, काही नवरदेव भारतात लग्न झाल्याबरोबर तातडीने गायब होतात. असेही काही एनआरआय पती आहेत, जे आपल्या पत्नीला भारतात परत येऊ देत नाहीत. नवविवाहित पत्नीला सोबत घेऊन परदेशी जाणारे आणि तिथेच तिला सोडून देणारे नवरेही कमी नाहीत. काही पती आपल्या सोडलेल्या पत्नीला भारतात जाऊ देतात; परंतु मुलांवरील कब्जा सोडत नाहीत. परदेशात जाऊन सुखी जीवन व्यतीत करण्याची स्वप्ने असलेल्या काही मुलींना असाही अनुभव येतो की, त्या परदेशात जातात आणि त्यांचा नवरा त्यांना न्यायला विमानतळावरसुद्धा येत नाही. या मुलींकडे त्यांच्या पतीचा योग्य पत्ताही नसतो. नवरदेवांची ही फसवणूक यशस्वी होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, अनेकजणांनी फसवणूक करण्यासाठी आधीपासूनच पद्धतशीर नियोजन केलेले असते.
मुक्त विचार आणि उच्च शिक्षण जणू नावालाच असलेल्या कुटुंबांकडून अशा लग्नांमध्ये मुलीच्या आईवडिलांकडून प्रचंड हुंडाही उकळला गेल्याची उदाहरणे आहेत. एवढे होऊनसुद्धा आजही एनआरआय नवरदेवांना मोठी “मागणी’ आहे हे विशेष! अर्थात, आता सरकारनेच अशा प्रकारच्या वाढत्या प्रकरणांची योग्य दखल घेऊन जी पावले उचलली आहेत, त्यामुळे एनआरआय नवरदेवांच्या मनमानीला चाप बसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
– ऍड. प्रदीप उमाप