डेटा सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांची माहिती
नवी दिल्ली : आसाममधील अंतिम राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा डेटा वेबसाईटवरून ऑफलाईन झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही घटना तात्पुरत्या स्वरुपाची असून, येत्या काही दिवसात यातील अडचणी दूर केल्या जातील, असे आसाममधील सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये हा डेटा जाहीर करण्यात आला होता. यामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी सूचीमधील अर्जदारांची नावे आणि अर्जदार नसलेल्यांची नावे देण्यात आली होती. ही यादी संबंधित वेबसाईटवरून बेपत्ता झाली आहे. या डेटाच्या साठवणुकीसाठी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी विप्रोची मदत घेण्यात आली आहे. याच कंपनीशी करण्यात आलेल्या कराराची मुदत संपल्यामुळेच हा डेटा सध्या ऑफलाईन झाला आहे.
या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्येच विप्रोशी करण्यात आलेल्या कराराची मुदत संपली होती. त्यानंतर 15 डिसेंबरपासून हा डेटा ऑफलाईन झाला. विप्रोकडूनच तो ऑफलाईन करण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे हा करार अद्ययावत करण्यास उशीर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात कराराचे नूतनीकरण करण्यात येईल. त्यासाठी आम्ही विप्रोच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. कराराचे नूतनीकरण झाल्यावर हा डेटा पुन्हा एकदा उपलब्ध होईल.