रायपुर – नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स हे दोन प्रयोग गरीबांसाठी नोटबंदी इतकेच त्रासदायक आहेत असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. आज येथील विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की एनपीआर असेल किंवा एनआरसी हे दोन्ही प्रस्ताव गरीबांवरच नवा कर लादल्यासारखे आहेत.
नोटबंदीने गरीबांवरच भार टाकला गेला होता. त्यातून लोकांचे पैसे गेले, त्यावेळी लोकांना त्यांच्या स्वताच्या खात्यावरचे पैसे सुद्धा काढता आले नव्हते. हा सारा पैसा देशातील 15-20 श्रीमंत लोकांच्याच खात्यात गेला. एनपीआर आणि एनआरसी हा तसाच प्रकार आहे. त्यातून गरीबच भरडला जाणार आहे असे ते म्हणाले.
आपल्या नागरीकत्वाचे पुरावे देण्यासाठी लोकांना सरकारी कार्यालयांचे खेटे मारावे लागणार आहेत. तेथील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागणार आहेत.त्यांच्या नावात थोडीशी जरी चुक कागदोपत्री झालेली असेल तरी त्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याशिवाय त्यांचे काम होणार नाही. अशा पद्धतीने लोकांकडून कोट्यावधी रूपये काढले जातील आणि हेच पैसे पुन्हा त्याच 15 जणांना दिले जातील असे ते म्हणाले. हे वास्तव आहे आणि हा गरीबांवरील हल्ला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
देशाच्या अर्थव्यस्थेची मोदींनी पुरती विल्हेवाट लावली आहे असा आरोप करून ते म्हणाले की आमच्या काळात ज्या पद्धतीने जीडीपी मोजला गेला त्याच पद्धतीने आजचा जीडीपी मोजला तर तो केवळ अडीच टक्के इतकाच भरेल असे ते म्हणाले. गरीब आज रोजगार मागत आहे, पण आज गरीबांच्याच खिशातून पैसा काढला जात आहे त्याच्या बदल्यात लोकांना आज नेमके काय मिळत आहे असा सवालही त्यांनी केला.
आज संपुर्ण देशात हिंसाचाराचा वणवा भडकला आहे. महिलांना रस्त्यावरून सुरक्षित फिरता येत नाही, बेरोजगारीचा दर 45 वर्षांच्या पातळीवर गेला आहे पण मोदींच्या लक्षात या बाबी येत नाहीत असे ते म्हणाले. हे कसे घडते आहे आणि का घडते आहे हे समजून घेण्याची त्यांची तयारी नाही असेही राहुल गांधी यांनी नमूद केले. पुर्वी मोदी हे टिंगल करून विषय उडवून लावायचे पण आता त्यांना पंतप्रधान म्हणूनही आपली जबाबदारी पार पाडता येईनाशी झाली आहे. देशाचा वेळ नाहक बाबींमध्ये फुकट दवडला जात आहे असे ते म्हणाले.
नोटबंदीच्या काळात गरीब जनता आणि शेतकऱ्यांच्या खिशातून पैसा हिसकावला गेला. त्यातून देशातील दहा ते पंधरा लोकांना साडे तीन लाख कोटींचा मलिदा मिळाला. आज लोकांची क्रयशक्ती खालावली आहे, त्यामुळे बाजारातील खरेदी थांबली आहे.हे साधे अर्थशास्त्र आहे. पण ते मोदींच्या लक्षातच येईनासे झाले आहे असे ते म्हणाले.