-विनोद मोहिते
इस्लामपूर – वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अपंग व्यक्तींची तपासणी करून त्यांना दिले जाणारे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र आतां इस्लामपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मिळणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले,” कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत पहिला कॅम्प ( ता.१३ मार्चला ) आयोजित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पत्रकार बैठक झाली. जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,तालुका अध्यक्ष विजय पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई पाटील, तालुका अध्यक्ष सुस्मिता जाधव, रोजा किणीकर,कमल पाटील, विशाल पाटील, स्वरूप मोरे सचिन कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संजय पाटील म्हणाले,” विविध शासकीय योजनांसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेताना वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अपंगांची सांगली येथे जाताना ससेहोलपट होत होती. तेथे शासकीय रुग्णालयात एकाच ठिकाणी जिल्ह्यातील सर्वच अपंग बांधवांना अपंगत्वाची तपासणी करून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जात होते. तिथे अपंग बांधवांना ने-आण करणे, हे त्यांच्या कुटुंबाला अडचणीचे,वेळखाऊ आणि आर्थिक झळ पोहोचवणारे होते.
अपंग बांधवांनी व्यथा मांडल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी या प्रश्नावर आम्ही चर्चा केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांशी संवाद साधत याबाबत पुराव्याला यश आले आहे. वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अपंग बांधवांना सांगली येथे अपंग प्रमाणपत्र आणि तपासणी करण्यासाठी जाण्याची आतां गरज भासणार नाही.
इस्लामपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात शासनाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत दिव्यांग व्यक्तीची तपासणी केली जाईल. अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्याची सोय होणार आहे. यासंदर्भातचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी याबाबत कार्यालयीन आदेश दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.” यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार धनश्री भांबुरे उपस्थित होत्या.
एजंटांच्या आर्थिक मागणीला बळी पडू नका –
अपंग व्यक्तींची तपासणी करून त्यांना दिले जाणारे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळवण्यासाठी अपंग नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही भूल थापाना तसेच एजंटांच्या आर्थिक मागणीला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.