नवी दिल्ली: निवडणूक आयोगाकडून कायदे मंत्रालयाला मतदान ओळखपत्र आधार कार्डला जोडण्यात यावे अशी मागणी केली आहे. यासाठी आयोगाने कायदे मंत्रालयाला एक पत्रदेखील लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे. मतदान ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी आयोगाकडून करण्यात आली आहे. तसेच हे पाऊल उचलल्यामुळे देशात बनावट मतदारांचे पितळ उघडे पडेल तसेच हा निर्णय देशहितासाठी उपयोगी ठरेल असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याची मागणी निवडणूक आयोगानं याआधीही सरकारकडे केली होती. मात्र त्यावेळी आधार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होते. त्यामुळे सरकारनं मतदार ओळखपत्र आणि आधारच्या जोडणीचा विषय टाळला. मात्र आता निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा याबद्दलची मागणी केली आहे. त्यामुळे आयोगाला अशी अपेक्षा आहे की मंत्रालय त्यांच्या मागणीचा पुन्हा विचार करेल.