पुणे – केंद्र सरकारने व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणुकीची मर्यादा आणखी घटवली आहे. घाऊक व्यापाऱ्यांना 25 टनाची मर्यादा कायम असून किरकोळ व्यापाऱ्यांना आता 5 ऐवजी दोनच टन कांद्याची साठवणूक करता येणार आहे. पुढील आदेश येऊपर्यंत ही मर्यादा कायम राहणार आहे.
कांद्याचे भाव वाढू लागल्याने केंद्र सरकाने 29 सप्टेंबरला जीवनावश्यक वस्तू कायद्याचा आधार घेत कांदा साठवणुकीवर निर्बंध आणले. सुरुवातीला मोठ्या व्यापाऱ्यांना 50 टन, तर तर किरकोळ व्यापाऱ्यांना 10 टन कांदा साठवणूक करण्याची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. त्यानंतर दि.3 डिसेंबरला ही मर्यादा आणखी घटवण्यात आली. त्यानुसार मोठ्या व्यापाऱ्यांना 25 टन तर किरकोळ व्यापाऱ्यांना 5 टनाची मर्यादा घालून देण्यात आली. आता दि.9 डिसेंबरला केंद्र सरकारने सुधारित आदेश काढला आहे.
घाऊक व्यापारी 25 टन तर किरकोळ व्यापारी केवळ दोन टनच कांदा साठवू शकणार आहेत. जिल्ह्यात कोठे कांद्याची साठेबाजी करण्यात येत असल्याचे आढळून आले, तर पुरवठा विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बाजारात आता नवा कांदा येऊ लागला आहे. तो थेट ग्राहकांपर्यंत जावा, यासाठी साठवणुकीची मर्यादा घटवण्यात आली आहे.