नगर शहरात पाणी सोडण्याच्या वेळेत बदल
नगर – नगर शहराला पाणीपुरवठा करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून उद्यापासून या बदलाची अंमलबजावणी होणार आहे. यापूर्वी मध्यरात्री अडीच वाजता सुटणारे पाणी आता पहाटे चार वाजता सोडण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले. मध्यरात्री सोडण्यात येणाऱ्या वेळेत बदल करण्याची मागणीची तब्बल वर्षभरानंतर कार्यवाही करण्यात आली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. काही भागात रोटेशननुसार दैनंदिनही पाणीपुरवठा होतो.शहरात पाणीपुरवठ्याच्या विस्कळीपणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सात ते आठ दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठा प्रश्नी महासभेत अनेकदा गदारोळ झाला.
शहरात मध्यरात्री पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांच्या झोपेचे खोबरे होते. ही पाणी सोडण्याची वेळ चुकीची असून नागरिकांची गैरसोय होत आहे. परंतु त्यांचा विचार झाला नाही. कराचीवाला नगर, कोठला परिसरात रात्री अडीच ते साडेतीन यावेळत पाणी सोडण्यात येत होते. ते आता पहाटे चार वाजता सुटणार आहे.
शहराच्या विविध भागात सकाळी साडेसहापर्यंत रोटेशनप्रमाणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. कराचीवालानगर, रामवाडी परिसरास पहाटे 4 ते 5, जुना बाजार रोड, नांगरे गल्ली, पंचपीर चावडी, 5.15 ते 6.15, माणेश्वर गल्ली, माणिक चौक, तख्ती दरवाजा परिसर पहाटे 5.15 ते 6.15, तोफखाना, बागडपट्टी, चितळे रोड, चौपाटी कारंजा 5.15 ते 6.15, बारातोटी कारंजा व अप्सरा टॉकिज परिसर 5.30 ते 6.30. या प्रमाणे पाणी सोडण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.