काश्मीरप्रश्नी भारताबरोबर चर्चेचा सल्ला
जिनिव्हा: काश्मीरप्रकरणी पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रानेही मोठा दणका दिला आहे. भारत आणि पाकिस्तानने काश्मीरचा प्रश्न चर्चेने सोडविण्याचा सल्ला संयुक्त राष्ट्राने दिला. तसेच त्यांनी काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे. विशेष म्हणजे भारताने विनंती केली तरच या प्रश्नात मध्यस्थी करणार असल्याचे संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरेस यांना काश्मीरवरुन भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाची चिंता आहे. त्यांनी दोन्ही देशांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केल्याचे ग्युटेरेस यांच्या प्रवक्त्याने सांगितले. मागच्या महिन्यात फ्रान्समध्ये जी 7 परिषदेच्या निमित्ताने अँटोनिओ ग्युटेरेस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर चर्चा केली होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यासोबत सुद्धा त्यांचे बोलणे झाले आहे अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे मुख्य प्रवक्ते स्टीफेन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरुपी सदस्य मलीहा लोधी यांनी केलेल्या विनंतीवरुन ग्युटेरेस यांनी त्यांची भेट घेतली. काश्मीरमधल्या परिस्थितीवरुन भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढेल याची त्यांना भिती आहे. त्यांनी दोन्ही बाजूंना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. सर्वांसाठी त्यांचा सारखाच संदेश आहे असे ग्युटेरेस यांच्यावतीने स्टीफेन दुजारिक यांनी सांगितले. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ग्युटेरेस काश्मीर मुद्दावरुन भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करणार का? हा प्रश्न दुजारीक यांना विचारण्यात आला.
त्यावर त्यांनी तुम्हाला आमची भूमिका माहित आहे. आमच्यासाठी हा तत्वांचा विषय आहे आणि कायमच तो तसाच राहिल असे उत्तर स्टीफेन दुजारिक यांनी दिले. संयुक्त राष्ट्राच्या महसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान दोघेही उपस्थित राहणार आहेत.