मुंबई – भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा लवकर पूर्वपदावर आली आहे. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यापासून सर्व क्षेत्रांची उत्पादकता लॉकडाऊनच्या अगोदरच्या उत्पादकतेइतकी होणार आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात व्याजदर कपातीची शक्यता कमी आहे, असे एचडीएफसीचे संचालक केकी मिस्त्री यांनी म्हटले आहे.
एका वेबिनारमध्ये बोलताना मिस्त्री म्हणाले की, अर्थव्यवस्थेचा सर्वात खराब काळ संपुष्टात आला आहे. तिसऱ्या तिमाहीतील विकास दर शून्य टक्क्यावर जाईल, असे त्यांनी सूचित केले. रिझर्व्ह बॅंकेने चौथ्या तिमाहीत विकास दर शून्य टक्क्यापेक्षा जास्त होईल, असे पतधोरणात म्हटले आहे.
अर्थव्यवस्थेला गती मिळाल्यानंतर कर्जाची मागणी वाढेल. त्यामुळे आगामी काळात व्याजदर कमी होणार नाहीत. केंद्र सरकारने काही क्षेत्रांना योग्य वेळी पुरेशी मदत केल्यामुळे विविध क्षेत्रांत जास्त प्रमाणात बेकारी निर्माण झाली नाही, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात कर्ज परतफेड वेगात होण्याची शक्यता असून वर्षाअखेर अनुत्पादक मालमत्ता 10 टक्क्यांपेक्षा जास्त जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, जर करोना संसर्गाची संख्या वाढली तर मात्र परिस्थिती वेगळी असेल. भारताला पुन्हा एकदा लॉकडाऊन परवडणार नाही. कारण अगोदरच अर्थव्यवस्थेचे बरेच नुकसान झाले आहे, असे केकी मिस्त्री यांनी म्हटले आहे.
मॅन्युफॅक्चरिंग, रिऍल्टीकडे लक्ष देण्याची गरज
शेतीनंतर रिऍल्टी क्षेत्र अधिक रोजगार निर्माण करते. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात रोजगार निर्माण होतो. त्यामुळे आगामी काळात अर्थव्यवस्थेला मदत करताना सरकारने रिऍल्टी आणि मॅन्युफॅक्चरिंगसारख्या क्षेत्रांना अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर ग्राहकांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी कर कपातीच्या शक्यतेवर विचार करावा असे त्यांना वाटते.