मुंबई – टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लीक टीव्हीचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांना अटकेच्या कारवाई पासून दिलेले अभय मुंबई उच्च न्यायालयाने आज पासून काढून घेतले आहे. आता पोलिस अर्णव गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात पण त्यासाठी त्यांनी तीन दिवस आधी नोटीस दिली पाहिजे अशी अट हायकोर्टाने घातली आहे.
या प्रकरणाचा तपास किती दिवसांत पुर्ण करणार अशी विचारणा हायकोर्टाने मुंबई पोलिसांना केली होती. त्यावर या प्रकरणात आम्ही बारा आठवड्याच्या आत तपास पुर्ण करू अशी ग्वाही पोलिसांच्यावतीने देण्यात आल्यानंतर हायकोर्टाने पोलिसांना अर्णव गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यास अनुमती दिली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणात टीआरपी ठरवणाऱ्या बार्क संस्थेचा प्रमुख पार्थो दासगुप्ता हा अर्णव गोस्वामीचा मित्र आहे, व त्यांच्यात व्हॉट्सऍपच्या माध्यमातून जी चर्चा झाली आहे
त्याचा तपशील पोलिसांकडे उपलब्ध आहे. त्यानुसार पार्थो दासगुप्ता याला अटक करण्यास कोर्टाने अनुमती दिली होती. तो नुकताच जामीनावर सुटला आहे. अर्णव गोस्वामी याला अटक करण्याची संधी मिळावी यासाठी मुंबई पोलिस अनेक दिवस प्रयत्नशील होते. पण कोर्टाने अटकेच्या कारवाईला अनेक वेळा मनाई करीत विविध मुदत देऊन गोस्वामी यांना दिलासा दिला होता. पण संशयितांवर अशी टांगती तलवार किती दिवस ठेवायची हा विषय आजच्या सुनावणीत उपस्थित झाला होता. खोटी आकडेवारी दाखवून रिपब्लीक टीव्हीने आपला टीआरपी वाढवून घेतला होता असा आरोप आहे, त्या संबंधातील हे प्रकरण आहे.