सचिन अहिर यांचे चिंतन बैठकीत टीकास्त्र : उपनेते रवींद्र मिर्लेकरांनीही डागली तोफ
ओतूर – पुणे जिल्ह्याचे लॉकडाऊन उठले आहे. अशी बोचरी टीका शिवसेना सोडलेले माजी खासदार व आमदारांचे नाव न घेता शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथील शिवसेनेच्या चिंतन बैठकीत केली.
यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, अशोक खांडेभराड, दिलीप बाम्हणे, संभाजी तांबे, शरद चौधरी, माऊली खंडागळे, गणेश कवडे, दिलीप डुंबरे, अविनाश बलकवडे, संजय गाढवे, मंगेश काकडे, योगेश(बाबू)पाटे, आशिष शहा, जीवन शिंदे, समीर भगत, सुनील मेहेर, सुरेश भोर, गुलाब पारखे, आनंद रासकर, अजित सहाणे, मोहन बांगर, विशाल बनकर, मनोहर डोंगरे, धोंडीभाऊ पानसरे, निलीमा तांबे, ज्योती महाबरे, मंजुश्री डुंबरे, विठ्ठल तांबे, बबन तांबे, ऍड. जयराम तांबे, सीताराम तांबे व जिल्हा परिषद गट आणि गणातील प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिर म्हणाले, शिवसेना हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना विधानसभेसाठी 288 जागा लढविण्याची तयारी आहे. यासाठी शिवसैनिकांनी आत्तापासूनच कामाला लागावे. सत्तेत राहून नेत्यांनी स्वतःसाठी लाभ उठवला आणि ते खुर्चीसाठी शिवसेना सोडून गेले आहेत; मात्र आजही कट्टर शिवसैनिक जागेवर आहे. याचेच प्रत्यय जुन्नर तालुक्यात घेतलेल्या चिंतन बैठकीवेळी उपस्थित जनसमुदायातून दिसून येतो.
जुन्नरमध्ये भाजपने पाठिंबा दिल्याने जुन्नरची विधानसभेची शिवसेनेची जागा गेली. भाजपने पक्षाला हायजॅक करण्याचा डाव आखला व याला शिरूर लोकसभेचे माजी खासदार व जुन्नरचे माजी आमदार व ते बळी पडले. खासदार स्वतः निवडून येतात मग आमदार का निवडून येत नाहीत, हा विचार आमदारांनी करायला हवा होता. ज्यांनी ज्यांनी राजकीय स्वार्थासाठी पक्ष सोडला त्यांचे पुढे काय झाले? व होणार असा मुश्किल सवाल त्यांनी यावेळी केला.
चाकण, जुन्नर, आंबेगाव, मंचर, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर आणि इतर ठिकाणी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची भावना समजवून घेऊन चिंतन बैठका घेऊन संघटना बांधणीसाठी त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे शिवसेना उपनेते अहिर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संभाजी तांबे यांनी प्रास्ताविक, दिलीप डुंबरे यांनी सूत्रसंचलन केले. ऍड. जयराम तांबे यांनी आभार मानले.
शरद सोनवणे यांनी चूक केली त्यांना आम्ही आमदार करणार होतो; परंतु ते आता आमदार होऊ शकत नाही. ज्या भाजपच्या वळचणीला गेलेत त्या पक्षाच्या आशा बुचके यांना उमेदवारी मिळणार, मग सोनवणे यांचे काय होणार?
-रवींद्र मिर्लेकर, शिवसेना उपनेते