अहिल्यानगर : कांद्याचे क्षेत्र नसतांनाही पीकविमा उतरविला तसे लागवडीपेक्षा जास्त क्षेत्र दाखवून विमा लाटण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. आता त्यापाठोपाठ फळबागाचाही विमा लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. फळबाग नसतांनाही विमा उतरविण्यात आला असून लागवडीपेक्षा जास्त क्षेत्र विम्यासाठी दाखविण्यात आले आहे. कृषी विभागाने केलेल्या तपासणीत हा प्रकार उघड केला आहे. सुमारे 2 हजार 627 शेतकर्यांची संख्या असून 1 हजार 208.14 हेक्टर क्षेत्र आहे. हे प्रकरण उघड झाल्यामुळे शासनाचे 89 लाख 44 हजार रुपये रकम वाचली आहे.
चार दिवसांपूर्वीच कृषी विभागाने कांद्यातून शेतकर्यांनी पीकविमा लाटल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. आता तो प्रकार फळबाग लागवडीत देखील झाल्याचे समोर आले आहे. सन 2024-25 या वर्षात राज्यात 73 हजार 777 शेतकर्यांनी फळबाग लागवडीसाठी नोंद केली. 50 हजार 443.86 विमा क्षेत्र संरक्षित करण्यात आले होते. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात 13 हजार 85 शेतकर्यांनी विम्यासाठी सहभाग नोंदविला असून 7 हजार 515.24 क्षेत्र विमा संरक्षित केला आहे.
26 जुलै 2024 रोजी पुण्यात कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठीक पुनर्रचित हवामान आधारित फळ वपीक विमा योजनेत मागील तीन वर्षामध्ये आढळून आलेल्या बोगस अर्जाची संख्या पाहाता फळबाग नोंदणी केलेल्या सर्व क्षेत्राची तपाणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यात 2 हजार 25 ठिकाणी फळबागा नसतानाही विमा उतरविल्याचे स्पष्ट आढळून आले. असे क्षेत्र 1 हजार 62.3 इतके आहे. तसेच 660 ठिकाणी फळबाग लागवडी पेक्षाही जास्त क्षेत्राचा विमा उतरविण्यात आल्याचे समोर आले. असे क्षेत्र 212.07 इतके आहे.
सुमारे 1 हजार 275 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविण्यात आल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात मात्र फळबाग नसल्याचे तपासणीत दिसले. फळबागांच्या विम्या हप्त्यापोटी राज्य शासनाने 44 लाख 72 हजार तर केंद्र शासनाने देखील 44 लाख 72 हजार असे एकूण 89 लाख 44 हजार रुपये विमा कंपन्यांना भरले होते. आता हा प्रकार उघडकीस आल्याने विम्यासाठी हे बोगस क्षेत्र रद्द होणार असून त्यामुळे शासनाचे 89 लाख 44 हजार रुपयांची बचत होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.
तालुकानिहाय शेतकरी संख्या व क्षेत्र पुढील प्रमाणे आहे. कंसात क्षेत्र दिले आहे. नगर- 386 (210.18), श्रीगोंदा- 288 (102.91), पाथर्डी- 498 (200.88), राहाता- 170 (91.30), कर्जत- 296 (127), जामखेड – 55 (22.47), संगमनेर – 387 (165.47), पारनेर – 223 (91.38), कोपरगाव – 234 (139.45), राहुरी – 34 (19.4), नेवासा – 56 (37.7).
पाथर्डी नगर तालुका आघाडीवर
फळबागाचा विमा लाटण्यात पाथर्डी व नगर तालुका आघाडीवर आहे. या दोन तालुक्यात शेतकरी व क्षेत्र देखील जास्त आहे. जिल्ह्यात अकोले, शेवगाव, श्रीरामपूर हे तीन तालुके वगळले तर अन्य सर्वच अकरा तालुक्यात फळबागाचा विमा लाटण्याचा प्रयत्न झाला आहे.