बीड : करोनाच्या संकटात आता मराठवाड्यात दुष्काळाने डोके काढण्यास सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यात पाण्याची अतिशय कमतरता आहे. घागरभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या भागातील तांडा गावात केवळ एकच विहीर आहे. या विहिरीत जीव धोक्यात घालून पाणी काढावे लागत आहे. गावातली स्नेहल राठोड ही मुलगी विहीरीत उतरुन पाणी काढतानाची दृष्य एका वाहिनीच्या कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहेत.
एक घागर भरण्यासाठी तब्बल 15 मिनिटं जातात. त्यानंतर भरलेली घागर डोक्यावर घेऊन धोकादायक रितीने विहिरीतून बाहेर यावं लागत आहे. या गावात मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर आहेत. शासनाकडून ऊसतोड मजुरांच्या मुलांना देण्यात येणारं दुपारचं भोजनही बंद आहे. त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच पाण्यासाठी ही अशी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.