पुणे – स्वस्त धान्य दुकानांमधून 1 ते 27 मे दरम्यान राज्यातील 1 कोटी 47 लाख 53 हजार 728 शिधापत्रिकाधारकांना 69 लाख 65 हजार 700 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 59 हजार 12 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. या योजनेमधून सुमारे 20 लाख 10 हजार 883 क्विंटल गहू, 15 लाख 45 हजार 146 क्विंटल तांदूळ, तर 21 हजार 453 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 4 लाख 15 हजार 276 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहात आहे, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेंतर्गत अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रति लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 4 मे पासून एकूण 1 कोटी 15 लाख 34 हजार 292 रेशनकार्डला तांदूळ वाटप मोफत केले आहे. या रेशनकार्ड वरील 5 कोटी 18 लाख 31 हजार 676 लोकसंख्येला 25 लाख 91 हजार 580 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे. राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 76 एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप 24 एप्रिलपासून सुरू होऊन आतापर्यंत 8 लाख 18 हजार 90 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.