रेडा – इंदापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई गावोगावी झाली होती. मात्र, परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातच पाणी साचले आहे. त्यामुळे गावाकडील म्हशी पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत.
बिजवडी, निमगाव केतकी भागात पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात अद्यपी साचलेले आहे. कित्येक शेतकरी तर शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी खूप शकला लढवत आहेत;परंतु शेतातील पाणी कमी होत नाही. निमगाव केतकी परिसरातील व्याहळी, कौठळी भागात शेतातच पाणी जास्त असल्यामुळे म्हशी उन्हाचा चटका लागताच पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत आहेत.
या भागातील शेतकऱ्यांनी निर्माण केलेली शेततळी तुडुंब झाली आहेत. पुन्हा आपली शेती हिरवीगार दिसणार आहे, या आशेने शेतकरी सुखावला आहे.