संगमनेर – देशात सध्या सर्वत्र महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोरगरिबांच्या भाकरीवर आणि दुधावरही जीएसटी लावला आहे. इंग्रजांनी मीठावर कर लावला होता. आता भाजप सरकारने पिठावर कर लावला आहे.हुकूमशाही व बेरोजगारी महागाई हटविण्यासाठी आता या क्रांती दिनानिमित्त भाजप सरकारलाही चलेजाव म्हणावे लागणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात कॉंग्रेसच्या वतीने आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. नेहरू चौक येथे अशोक स्तंभाला अभिवादन करून या पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दुर्गाताई तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, मिलिंद कानवडे, गजेंद्र नाकील, किशोर टोकसे, सुरेश झावरे, जीवन पांचारिया, निर्मलाताई गुंजाळ, सुषमा भालेराव, सुनंदाताई जोर्वेकर आदींसह कॉंग्रेसच्या विविध सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ही पदयात्रा नेहरू चौक -बाजारपेठ- गांधी चौक- नगरपालिका- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन या ठिकाणी सभा झाली. त्यावेळी आ. थोरात बोलत होते. ते पुढे म्हणाले, अग्निपथ योजनेला तरुणांचा मोठा विरोध आहे. सरकारच्या या सर्व धोरणांविरुद्ध सर्वसामान्य जनतेमध्ये मोठा आक्रोश आहे. कॉंग्रेस नेते खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो अभियानांतर्गत संपूर्ण देशांमध्ये आजादी गौरव यात्रा सुरू आहे. हुकूमशाही व बेरोजगारी महागाई हटविण्यासाठी आता या क्रांती दिनानिमित्त आपल्याला चलेजाव म्हणावे लागणार आहे.
यावेळी आमदार डॉ. तांबे, दुर्गाताई तांबे यांची भाषणे झाली. यावेळी लक्ष्मणराव कुटे, बाबासाहेब ओहोळ, संतोष हासे, सुहास आहेर, राजेंद्र गुंजाळ, रामहरी कातोरे, सुनंदाताई जोर्वेकर,अजय फटांगरे उपस्थित होते. प्रास्ताविक मिलिंद कानवडे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. बाबा खरात यांनी केले तर सोमेश्वर दिवटे यांनी आभार मानले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी संगमनेर शहर दुमदुमून गेले.