संतोष पवार
“जलजीवन मिशन’ अंतर्गत जिल्हा परिषदेचा पुढाकार
सातारा – जिल्ह्यातील एकही कुटुंब पिण्याच्या पाण्याच्या नळ कनेक्शनपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. “जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत याबाबत चांगले काम सुरू आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन घरोघरी मिळणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते (स्वच्छता व पाणी) यांच्या पुढाकाराने प्रत्येक गावात, प्रत्येक घरात नळ जोडणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रामीण भागात विशेषत: महिलांनाच घरात पाणी भरावे लागते. घरात नळ कनेक्शन नसल्याने महिलांना सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागते. त्यामुळे महिलांना अधिक श्रम करावे लागून त्यांचा वेळ वाया जातो. शासनाने आता घरोघरी शौचालयाबरोबर नळ कनेक्शनची योजना राबवल्याने मुबलक पाणी मिळणार असून महिलांचे श्रम व वेळ वाचणार आहे. जिल्ह्यातील एकही कुटुंब या योजनेपासून वंचित राहू नये, अशी सूचना संजय भागवत यांनी बैठकीत दिली होती.
त्यानुसार पाणी व स्वच्छता मिशन, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. दिलेल्या नळकनेक्शनची माहिती केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर भरण्याचे काम सुरू आहे. ही माहिती अचूक असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडून घेण्यात येत आहे. दि. 15 डिसेंबरअखेर प्रत्येक गावातील घरगुती नळकनेक्शनची माहिती अद्ययावत करण्याची सूचना देण्यात आली आहे. जिल्ह्यात पाच लाख 54 हजार 588 कुटुंबे असून त्यापैकी दोन लाख 15 हजार 280 कुटुंबांकडे नळ कनेक्शन 31 मार्च 2019 अखेर होती. आता त्यात वाढ होऊन दोन लाख 53 हजार 928 नळ कनेक्शन झाली आहेत. प्रत्येक घरात नळ कनेक्शन देणे तितके सोपे नसले तरी केंद्राच्या धोरणाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे.
जलस्रोतांचे होणार बळकटीकरण
प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देण्यासाठी गावोगावचे जलस्रोत बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने हे काम हाती घेण्यात आले आहे. पाणलोटच्या धर्तीवर प्रत्येक गावात भूजल पातळीत वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. टॅंकरमुक्तीसाठीही प्रयत्न होत आहेत.
दुर्गम भाग अजूनही वंचित
“जलजीवन मिशन’ची प्रभावी अंमलबजावणी होत असली तरी या योजनेत दुर्गम भाग वंचित राहत आहे. विशेषत: जावळी, पाटण, महाबळेश्वर या तालुक्यांच्या काही भागात सार्वजनिक नळ कनेक्शनची संख्या जास्त आहे. दुर्गम भागात लोक दूरवर वास्तव्यास असल्याने जलवाहिन्यांचे काम करण्यात अडचणी येत आहेत. दुष्काळी भागात नळ कनेक्शन आहेत; परंतु त्यातून वर्षातून किती दिवस पाणी येणार, याची साशंकताच आहे.