नवी दिल्ली – निवडणूक मॅनेजमेंट सोडून देऊन पंतप्रधान मोदींनी आता देशातील कोविड मॅनेजमेंटकडे जरा लक्ष देण्याची गरज आहे, अशी सूचना आम आदमी पक्षातर्फे पंतप्रधानांना करण्यात आली आहे. त्या पक्षाचे प्रवक्तेराघव चढ्ढा यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, ज्या प्रमाणात मोदींच्या निवडणूक रॅली वाढताहेत त्याच प्रमाणात देशात करोना वाढतो आहे. पण आता मोदींनी देशातील या भयावह करोना स्थितीकडे थोडे तरी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
निवडणूक येतील आणि जातील, पण लोकांचा जीव गेला तर तो कसा परत मिळणार, असा प्रश्नही चढ्ढा यांनी उपस्थित केला. गेल्या 24 तासांत देशातील करोना रुग्णांमध्ये 2 लाख 61 हजार 500 रुग्णांची भर पडली आहे. सक्रिय बाधितांचा आकडा 18 लाखांवर गेला आहे. ही सारी स्थिती मोदींनी लक्षात घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.