शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन पहिल्यांदाच मालाची निर्यात केली
पुणे – महाराष्ट्रातून द्राक्ष आणि आंबा या दोनच फळांची निर्यात होऊ शकते, या शासकीय मानसिकतेला छेद देत नागपूरच्या संत्री उत्पादकांनी चक्क एकत्रित येऊन दुबईला संत्री निर्यात केली असून,हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
महाराष्ट्रातून आंबा सुमारे 30 हून अधिक देशांमध्ये, तर द्राक्षे ही युरोप आणि दुबई मार्केटमध्ये विकली जातात. या व्यतिरिक्त केळी निर्यात केली जातात, पण ठराविक देशांमध्ये हा व्यापार चालतो. नागपूरची संत्री निर्यात होऊ शकतात, याबाबत शासन स्तरावर कधीही विचार झाला नव्हता.तर, दुसऱ्या बाजूला नागपूरमधील संत्री उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार मागणी केली होती. “आमची संत्री निर्यातक्षम आहेत, त्याला जागतिक बाजारपेठ मिळू शकते.’ असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यांची दखल कुणीही घेतली नव्हती. “अपेडा’ अर्थात कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने संत्र्यांसाठी आवश्यक “सिट्रसनेट’ यंत्रणा सुरू केली नव्हती.
अखेर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यावेळी गडकरी यांनी “अपेडा’स्तरावर “सिट्रसनेट’ सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर निर्यातीसाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याच्या सूचनाही दिल्या. त्यामुळे संत्री निर्यातीचा मार्ग मोकळा झाला होता, पण निर्यातक्षम संत्री आणायची कोठून? असा प्रश्न निर्माण झाला. मग अमरावती व नागपूर जिल्ह्यांतील 50 शेतकरी एकत्र आले व प्रत्येकाने आपल्याकडील निर्यातक्षम संत्री दिली. त्याचवेळी एका स्थानिक निर्यातदाराने संत्री निर्यातीची जबाबदारी घेतली. याचा खर्च शेतकऱ्यांनी उचलला आणि जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात 17 टन क्षमतेचा एक कंटेनर दुबईला पाठवण्यात आला.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन मालाची निर्यात केली आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. यापूर्वी वाराणसीतील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन मिरचीची निर्यात केली होती.