दिवाकर रावते यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ
मुंबई – एसटीचा प्रवास आता कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे. एसटीच्या आज साजऱ्या झालेल्या 71व्या वर्धापन दिनी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईतील लोकल रेल्वेच्या एटीव्हीएम या कॅशलेस प्रणालीच्या धर्तीवर एसटीचे हे स्मार्ट कार्ड असेल.
स्मार्ट कार्डची किंमत 50 रुपये असणार असून सुरुवातीला 300 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत 5 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल. हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणीही व्यक्ती किंवा मित्र एसटीमधून हे कार्ड स्वाईप करुन प्रवास करु शकतील. एसटी प्रवासाशिवाय शॉपिंगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.
ऑगस्ट क्रांती मैदानाजवळील गोकुळदास तेजपाल सभागृहात एसटीचा 71 वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री रावते यांनी प्रवाशांसाठी तसेच एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी भरघोस योजना जाहीर केल्या.
एसटीसाठी सध्या इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नजिकच्या काळात एसटीच्या सर्व गाड्या एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) वर चालविण्यात येतील, असेही रावते यांनी यावेळी सांगितले. यामुळे एसटीची सुमारे 800 कोटी रुपयांची बचत होणार असून प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच वेतनवाढ जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांसाठीही त्यांना यापूर्वी अंतरिम वाढ दिल्याच्या दिनांकापासून सातव्या वेतन आयोगातील 2.67 च्या गुणकाप्रमाणे वेतवाढ लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय अधिकाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्यात येत असल्याचे तसेच उपदानाची (ग्रॅज्युटी) मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांमधून अधिकारीपदी बढतीची कार्यपद्धतीही सुलभ करण्यात आली असून आतापर्यंत 163 कर्मचाऱ्यांना अधिकारीपदी बढती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यास अजून 500 ते 600 कर्मचाऱ्यांना बढती देण्यात येईल. याशिवाय लिपीकपदाच्या भरतीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी 25 टक्के आरक्षण ठेवण्यात आल्याचेही मंत्री रावते यांनी यावेळी नमूद केले.