मुंबई :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्याचे काम राज्यातील एसटीने केला. आता याच एसटीचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची वाहतूकही करणार आहे. कारण महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन(एसटी) महामंडळास प्रवासी वाहनांमधून मालवाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.
राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम दिसून येत असताना एसटी महामंडळाच्या बसेस मधून आता माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मालवाहतुकीची कार्यप्रणाली ठरविण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलाय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या महामंडळाच्या विभागीय कार्यालयात समन्वय अधिकाऱ्याची (नोडल ऑफिसर) ची नेमणूक करण्यात आलीय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे समाजातील सर्व घटकांना म्हणजेच शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना माफक दरात उपलब्ध करून दिलेल्या मालवाहतुकीच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.
एसटीने मालवाहतूकीचा प्रारंभ कोकणच्या हापूस आंब्याच्या वाहतूकीने केला. कोकणचा हापूस मुंबई-पुण्याच्या ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहे. महामंडळाकडे सुमारे 18 हजार 500 बसेस असून त्यामध्ये सुमारे 300 ट्रक चा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी, महामंडळाने प्रवासी वाहतूकीसाठी असलेल्या सुविधांचा लाभ मालवाहतूक करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरुवातीला महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या ट्रक मधून मालवाहतूक करण्यात येणार आहे. त्यामधून साधारण नऊ मेट्रिक टन पर्यंत वजनाच्या मालाची वाहतूक थेट पद्धतीने किंवा टप्पा पद्धतीने केली जाणार आहे. महामंडळातर्फे विहित आयुर्मान पूर्ण केलेल्या प्रवासी वाहनांमध्ये अंतर्गत बदल करून 9 मेट्रिक टन वजनाचा पर्यंतच्या मालाची वाहतूक केली जाणार आहे.मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या बुकिंगची व्यवस्था, महामंडळाच्या प्रत्येक आगारात , बस स्थानकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीची कार्यप्रणाली लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.