डॉ. मेघश्री दळवी
आज जागतिक महासागर दिन. यानिमित्ताने आपल्या महासागरांवर एक नजर टाकली तर प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या दुहेरी धोक्यांचा परिणाम म्हणून त्यांची आम्लता हळूहळू वाढताना दिसते. पृथ्वीवर जेवढे पाणी आहे, त्यातले जवळजवळ 97 टक्के पाणी महासागरांत आहे. वातावरणातला कार्बन डायऑक्साइड आणि इतर ग्रीन हाऊस वायू वाढले की ते वाढलेला कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. त्यामुळे वातावरणाला फायदा झाला तरी हा कार्बन डायऑक्साइड पाण्याशी संयोग पावून कार्बोनिक आम्लात रूपांतरित होतो आणि महासागरांची आम्लता वाढते. एका संशोधन गटाच्या अभ्यासानुसार 2002-2011 या काळात निर्माण झालेल्या कार्बन डायऑक्साइडपैकी सुमारे 26 टक्के हा महासागरांमध्ये गेलेला आहे. हे प्रमाण वर्षाला अडीच अब्ज टन इतके प्रचंड आहे आणि त्याने आम्लतेत सतत भर पडत आहे.
औद्योगिक क्रांतीनंतर गेल्या दोनशे वर्षांमध्ये महासागरांची आम्लता सुमारे 25 टक्क्यांनी वाढली आहे. त्यात गेल्या 50 वर्षांमधली वाढ अतिशय वेगाने झालेली आहे. हे चक्र असेच सुरू राहिले तर या शतकाअखेर ती 50 टक्के होईल. या वाढीव आम्लतेचा दीर्घकालीन परिणाम आपल्या परिसंस्थेवर होतो आहे. प्रवाळांना ही आम्लता झेपत नाही आणि जागोजागी ती नष्ट होताना दिसत आहेत. याचा थेट परिणाम किनारे खचण्यावर होत आहे. एकीकडे हिमनग वितळत असल्याने समुद्राची पातळी वाढत आहे आणि सोबत प्रवाळांमुळे किनाऱ्यांना जे नैसर्गिक संरक्षण मिळते तेही नाहीसे होत आहे.
वाढत्या आम्लतेमुळे अनेक सागरी जीवांची अंडी लवकर मरून जात आहेत. त्यातून काही वाचली तर पुढच्या अवस्थेत त्यांच्या त्यांच्या सांगाड्यात कॅल्शियम कार्बोनेट अपुरा पडतो. परिणामी एकूणच मासे, शिंपले अशा सागरी जीवांची संख्या घटत जाते. शैवालावर आम्लतेचा परिणाम होताना अजून दिसला नाही, पण त्यांचा आणखी अभ्यास करावा लागेल.
स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या एका पाहणीनुसार वाढत्या आम्लतेला तोंड देण्यासाठी काही सागरी जीवाणूंमध्ये उत्परिवर्तन (म्यूटेशन) होत आहे. काही भागांमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करणारे जीव विस्थापित होत आहेत आणि वेगळे जीव तिथे राहायला येत आहेत. महासागरांमधील एकूणच जैवविविधता कमी होताना आढळली आहे. या सगळ्याचा प्रभाव आपल्या अन्नसाखळीवर निश्चितच होणार आहे. वेगवेगळ्या सागरी जीवांचा उपयोग आपल्याला केवळ अन्न नव्हे तर औषधांसाठीही होतो हे लक्षात घेतले तर आपल्या अस्तित्वाला थेट धोका आहे. या व्यतिरिक्त सागरी प्रवाहांवर वाढत्या आम्लतेचा काय प्रभाव पडू शकतो यावरही संशोधन सुरू आहे.
कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी आज अनेक ठोस पावले उचलली जात आहेत. खनिज इंधनांचा वापर कमी करून इतर अपारंपरिक प्रकारे उर्जेवर भर दिला जात आहे. वातावरणातला कार्बन वेगळा करून शोषून घेण्यासाठी (कार्बन सिक्वेस्टरिंग) वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. कृत्रिम प्रकाशसंश्लेषण आणि इतर संशोधनाचा आसरा आहे. त्यातून मार्ग मिळून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन घटले, तर हळूहळू महासागरांची आम्लता पुन्हा मूळपदापर्यंत येऊ शकते आणि सागरी परिसंस्था पुन्हा बहरतील.