बेळगाव,- कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विजयादशमीच्या दिवशी म्हैसूर येथे होणारा शाही दसरा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्नाटक राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती.
त्यासाठी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथे चेक पोस्ट नाका उभारण्यात आला होता. पण आता महाराष्ट्र आणि गोव्यातून प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचे चेक पोस्ट हटवले जाणार आहेत.
कर्नाटकातील अनेक भाविक कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूर यासह अन्य तीर्थक्षेत्रांना नवरात्रीत दर्शनासाठी जात असतात. तेथून परत येताना त्यांना आरटीपीसीआर चाचणीची सक्ती अडचणीची ठरत होती. ही अडचण लक्षात घेऊन चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.