लवकरच बजावणार समन्स
मुंबई- बुडीत निघालेली आयएल ऍण्ड एफएस कंपनी सध्या आर्थिक संकटात आहे. या कंपनीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे, यापैकी एक म्हणजे दादरमधील कोहिनूर सीटीएनएल, आयएल ऍण्ड एफएस कंपनीचे बरेच व्यवहार संशयास्पद आहेत. यामुळे या व्यवहारात मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी चौकशासाठी ईडीच्या रडारवर आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएल ऍण्ड एफएस ही एक नामवंत फायनान्स कंपनी होती. मात्र कंपनीबाबत बऱ्याच तक्रारी असल्याने कंपनीविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी ईडीने कोहिनूर सीटीएनएलचे मुख्य वित्त अधिकारी यांचा जबाब नोंदवून घेतला असून आता राज ठाकरे यांना चौकशीसाठी समन्स बजावला जाणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी विरोधात प्रचार करुनही भाजपा-शिवसेना युतीला काही फटका बसला नव्हता. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे मोठा प्रभाव पाडू शकतात. यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा
खराब करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
देशात सध्या सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर ईडी आणि इतर तपास यंत्रणेचा गैरवापर करुन विरोधकांच्या अडचणी वाढवली जात असल्याचा आरोप केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात घेतलेली भूमिका जगजाहीर आहे. त्यामुळे तपास करण्याच्या नावाखाली राज ठाकरे आणि उन्मेष जोशी यांना टार्गेट करत आहेत की काय अशी चर्चा सुरु आहे.