मुंबई : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीचे सरकार स्थापन झाल्यापासून एकेकाळी देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला घरघर लागली आहे. काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसला सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. हाच धागा पकडून माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा हादरा बसला अशून माजी केंद्रीय मंत्री आणि जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जितिन प्रसाद यांनी नुकतीच अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत हातात कमळ घेतलं आहे. यावरुन निलेश राणे यांनी राहुल गांधींना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा खोचक सल्ला दिला आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, राहुल गांधींच्या जवळचे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे. मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरल्याचे निलेश राणे यांनी म्हटलं.
राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 9, 2021
जितीन प्रसाद यांनी, काँग्रेसप्रणित यूपीए-2 सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा ब्राह्मण चेहरा म्हणून ओळखले जायचे. काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांनी पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे एआयसीसी बंगालच्या सचिव पदाची धुरा देण्यात आली होती.