मुंबई – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडें प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. ते प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आहेत. त्यानुसार आधीच ठाकरी बाणा दाखवायला हवा होता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र अखेरीस का होईना राजानीमा घेतला, असं पाटील म्हणाले. तसेच राठोड यांचा राजीनामा घेतला. जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
याआधी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराचे आरोप केले होते. मात्र संबंधित तरूणीने आरोप मागे घेतले त्यानंतर ते प्रकरण शांत झालं. त्यावेळीही भाजपने आक्रमक भूमिका घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा टळला होता.