जयपूर – करोना संकटामुळे देशातील स्थिती भयावह बनत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता राजकीय सभा थांबवाव्यात, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या पश्चिम बंगालमध्ये शनिवारी मोदींच्या सभा झाल्या. त्याचा संदर्भ घेऊन गेहलोत यांनी ट्विट केले.
करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्याचा संसर्ग युवकांना आणि बालकांनाही होत आहे. यापुढे स्थितीची माहिती घेण्यासाठी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी सातत्याने संपर्क ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. करोना संकटाच्या हाताळणीवरून कॉंग्रेसकडून वारंवार मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. अशातच त्या पक्षाचे नेते असणाऱ्या गेहलोत यांनीही मोदी यांची कोंडी करण्यासाठी संबंधित ट्विट केल्याचे मानले जात आहे.