पाकिस्तानी, बांगलादेशी मुस्लिमांना हाकलण्याच्या मागणीसाठी नऊ फेब्रुवारीला मोर्चा
मुंबई : पाकिस्तानी आणि बांगला देशी मुस्लीमांना देशातून हाकलून देण्याच्या मागणीसाठी आणि त्या मुस्लिमांच्या पाठीशी घालण्यासाठी येथे निघालेल्या मोर्चाला उत्तर म्हणून नऊ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येईल, अश घोषणा करून राजमार्ग आता हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले अधिवेशन झाले. त्यात सकाळी राज यांनी आपले पुत्र अमित यांच्या राजकीय प्रवेश घडवून आणला. पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण त्यांनी केले. सायंकाळी झालेल्या सभेत राज्यातील परिस्थितीवर भाष्य करण्याचे टाळत त्यांन हिंदुत्वाचा मार्ग निवडल्याचे अधोरेखीत केले.
राज ठाकरे म्हणाले, पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या विरोधात मी आज बोलत नाही. रझा अकादमीच्या मोर्चात येथील महिला पोलिस भगिनींच्या अंगावर हात टाकण्यात आला होता. त्यावेळी त्या विरोधात मीच आवाज उठवला होता. तीच भूमिका आजही कायम आहे. राज्यात मी मराठी असून मराठीच्या मानेला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन आणि जर कोणी हिंदु धर्माला नख लावण्याचा प्रयत्न करतील तर हिंदु म्हणून मी अंगावर जाईन, असे सांगत त्यांनी आपली दिशा स्पष्ट केली.
काही तरी भयानक शिजत आहे
काही ठिकाणी परदेशी मौलवी येऊन शिकवत आहेत. तेथे पोलिसांना तेथे प्रवेश करू देत नाहीत. ती जागा कोठे हे मी देशाच्या गृहमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांची भेट घेऊन सांगणार आहे. जर पोलिसांना याची माहिती असेल तर त्यांचे हात का बांधून ठेवता? असा राज यांनी सवाल केला.
आपल्या पक्षाच्या झेंडा बदलाचे समर्थन करताना ते म्हणाले, मी पक्ष स्थापन केला त्यावेळी हाच झेंडा माझ्या मनात होता. मात्र त्यावेळी मला काही लोकांनी सोशल इंजिनिअरींगच्या नावाखाली हा रंग हवा, तो रंग हवा असे सांगत होते, पण शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कोणते मोठे सोशल इंजिनिअरींग असू शकते, अस सवाल त्यांनी केला.
मशिदीवरील भोंगे काढण्याची मागणी मनसे अध्यक्षांनी केली. ते म्हणाले आमच्या आरतीचा तुम्हाला त्रास होत नसेल तर तुमच्या भोंग्यांचा त्रास आम्ही का सहन करायचा? नमाज पठण जरूर करा पण त्यासाठी भोंगे लावण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला.
रंग बदलून सरकारमध्ये जाणारा नाही
मी जी भूमिका पुर्वी मांडत होतो. तीच भूमिका आजही मांडत आहे. माझ्या भूमिका मी बदलत नाही. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा मी नाही, अशा शब्दात त्यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.
सुधारित नागरी कायदा आणि एनआरसीचा निर्णय आणि राम मंदिराचा निर्णय या रागातून मुस्लिमांचे मोर्चे निघत आहेत. या मोर्चात इथले किती आणि पाकिस्तानी – बांगलादेशी किती याचा विचार करायला हवा, हे येथे निर्माण झालेले धोके दूर करायला हवेत, असे ते म्हणाले