नगर – कांदा हा रोजच्या जेवणातील महत्वाचा घटक असलेल्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. वडापावसाठी प्रसिध्द असलेल्या नगरी वड्याबरोबर खवय्यांना काकडी, मुळा, कांद्याची पात अन कोबी खावी लागते आहे. काद्यांचे दर वाढल्याने गृहिणीबरोबर खवय्यांच्या डोळ्यात देखिल पाणी आलं आहे. अनेक दिवसांपासून खाद्य पदार्थाच्या स्टॉलवरून कांदाभजे गायब झाले असून गोलभजे, बटाटाभजे आणि पालक भज्यांवर ग्राहकांना समाधान मानावे लागत आहेत.
कोणतेही खाद्य पदार्थ कांद्याशिवाय पुर्ण होत नाहीत. बाजारात कांद्याचे दर शंभर रूपयांपर्यत पोहचले आहेत. किरकोळ बाजारातील शंभरी पार गेले आहेत. वडापाव, पाणीपुरी, कांदाभजी, भेळ, मिसळ, कांदापोहे आदी खाद्यपदार्था बरोबर कांद्याचा वापर होत असतो. खाद्य पदार्थाच्या दुकानात कांद्याऐवजी ग्राहकांना काकडी, कोबी, कांद्याची पात आणि मुळा दिला जातो आहे.
नगर शहरात खानावळी आणि पोळी-भाजी केंद्रांचा मोठा व्यवयास केला जातो. शाकाहारी थाळीचा दर 60 ते 70 रुपये आहे. तर मटन थाळीचा दर 120 ते 150 रुपयांपर्यत आहे. कांद्याच्या भावाने गगन भरारी घेतल्यापासून येथील ग्राहकांच्या थाळीतून कांदा गायब झाला आहे.आडवडा बाजारात कांद्याचे दर 100 ते 120 रुपयांपर्यत वाढले आहेत.
कांद्याचे दर वाढले असले तरी खाद्यपदार्थाचे दर वाढलेले नाहीत. काही पदार्थामध्ये कांद्याचा वापर करावा लागत असल्याने त्याचा परिणाम व्यवसायिकांच्या नफ्यावर होत आहे. कांद्याचे दर वाढल्याने व्यवसायिकांना त्याचा उपयोग मर्यादीत केला आहे. कांद्याचे दर वाढल्याने खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर कांदा मागताना गिऱ्हाईक देखिल संकोचत असल्याचे दिसून आले.