भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली: देशाचा विकास दर घटून आता 5 वर गेला आहे. अशा स्थितीतही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही नवीन संकल्पना विचारात घेतल्या जात नसल्याने पंतप्रधान मोदी यांची पाच ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याची संकल्पना दुरापास्त वाटत आहे. आता या संकल्पनेला बायबाय करावे लागेल अशी प्रतिक्रीया भाजपचे नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली आहे.
आता केवळ धाडस किंवा या संकटाची कबुली देऊन भागणार नाही. पण दुर्देवाने या दोन्ही बाबीही सध्या होताना दिसत नाही अशी खंत त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर व्यक्त केली आहे. खरे पहाता धाडस आणि संकटाची कबुली या दोन्ही बाबींची नितांत गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलिकडेच काही उपाययोजना केल्या आहेत.
पण त्याच्या परिणामकारकतेवरही लोकांचा विश्वास उरलेला नाही. या उपाययोजना आताच्या बिकट परिस्थितीचा मुकाबला करण्यास पुरेशा नाहीत असे मत अनेक अर्थतज्ज्ञांनी आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केले आहे. विरोधकांकडूनही या बाबत सरकारवर रोजच हल्ला चढवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या सारखे ज्येष्ठ भाजप नेतेच सरकारच्या विरोधात मत प्रदर्शन करू लागल्याने सरकारला या हल्ल्याला सामोरे जाणे जिकरीचे ठरत आहे.