फुले खूप झाली..आता फुलांचा नाही, तर काम करण्याचा मौसम
इस्लामपूर (प्रतिनिधी) – राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री ना. जयंतराव पाटील यांचे सहाव्या मजल्यावरील दालन…गर्दीनं फुललेलं. प्रत्येकाला त्यांची भेट हवी होती. काही न काही सांगायचं होते. त्यांचे अभिनंदन करायचं होते. गर्दीत वाट शोधत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न होता. याची जाणीव ना. जयंतराव पाटील यांना होती. म्हणूनच त्यांनी आल्या-आल्या अभ्यागतांना भेटायला सुरुवात केली. एका मागून एक माणसं भेटत राहिली. कुणी हस्तांदोलन करत होतं, कुणी त्यांच्याशेजारी उभे राहून छायाचित्र काढून घेत होते, तर कुणी फुलं देऊन त्यांचे अभिनंदन करत होते.
यावेळी अहो खूप झाली फुले, फुलांचा नाही आता काम करण्याचा मौसम आहे. तुम्ही या भेटा, काही काम असेल तर सांगा, पण आता फुलं नको, आपल्याला सगळ्यांना मिळून खूप कामं करायची आहेत, तुम्हाला भेटण्यातच मला आनंद आहे, अशा भावना ना. जयंतराव पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी एका अभ्यागताने मौसम फुलोंका नही, काम का है, वा ! असं म्हणत त्यांच्या वाक्याला हिंदीतून दाद दिली. यावर सगळं दालनच हास्याच्या कारंज्यात भिजून गेलं. खाते वाटप झाल्यानंतर ना. जयंतराव पाटील त्यांच्या दालनात आले. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी अभ्यागतांप्रमाणेच विभागांचे अधिकारी, सचिव आणि कर्मचाऱ्यांची एकच गर्दी झाली. ना. पाटील यांनी दालनात येताच एकेक निवेदन स्वीकारुन त्यावर योग्य कार्यवाहीच्या स्वीय सहाय्यकांना सूचना दिल्या.
एक महिला अभ्यागत आपले निवेदन घेऊन आल्या होत्या. त्यांनी निवेदन ना. पाटील यांना दिलेही. पण त्यावर काही तरी लिहिण्याचे राहिलं म्हणून परत घेतले. जवळ पेन नव्हता, महिलेने इकडे तिकडे पाहिलं, त्यांची निकड त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी पटकन खिशाला लावलेला स्वत:चा पेन त्या महिलेला काढून दिला. पेन घेऊन महिलेने त्या निवेदनावर तिला जो काही मजकूर लिहायचा होता. तो लिहिला आणि पुन्हा आभारासह ते निवेदन मंत्री महोदयांना दिले. महिलेच्या डोळ्यात समाधान होते.
18 डिसेंबरला वस्तू आणि सेवा कर परिषदेची नवी दिल्ली येथे बैठक आहे, त्याची माहिती देण्यासाठी आलेल्या आयुक्त राजीव जलोटा यांच्याशी त्यांनी चर्चा केली. दालन गर्दीने दाटलेले होते. दिवस गडबडीचा आणि वेळ कामाचा होता. एकेक गोष्टी मार्गी लावत ते पुढे जात होते. कारण मौसम फुलांचा नाही, कामाचा आहे, हेच प्रत्येकाला अनुभवायला येत होते.