नवी दिल्ली -करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेवरील सावट आणखी गडद झाले आहे. काही दिवसांपासून अनेक खेळाडूंनी स्पर्धेतील माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशांची दारं काही काळासाठी भारतीय विमानांवरील बंदीमुळे बंद होत आहेत.
परिणामी काही ऑस्ट्रेलियन, इंग्लंडचे खेळाडू आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतत आहेत. त्यातच आता पंचांचीही भर पडत आहे. भारताचे आघाडीचे पंच नितीन मेनन आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रेफेल यांनी वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे.
अंपायर नितीन मेनन हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदोरचे आहेत.
त्यांची पत्नी आणि आईची करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कारणास्तव मेनन यांनी आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन मेनन हे आयसीसीची एलिट पॅनेल अंपायरमधील एकमेव भारतीय अंपायर आहेत. नुकत्याच झालेल्या भारत-इंग्लंड मालिकेत केलेल्या अंपायरिंगबद्दल त्यांना गौरवण्यातही आले होते.
नितीन यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे स्पर्धेत राहण्याची त्यांची मानसिकता नाही, असे बीसीसीआयने म्हटले आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सरकारने वाढत्या करोनामुळे भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे अंपायर पॉल रेफेल यांनीही काढता पाय घेतला आहे.
यापूर्वी दिल्लीकडून खेळणाऱ्या आर. अश्विनने आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर आता नितीन मेनन हे दुसरे भारतीय ठरले आहेत. याशिवाय तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू सुद्धा भारतातील करोनासंकटामुळे मायदेशी परतले आहेत. दरम्यान, बीसीसीआय आता अंपायर नितीन मेनन आणि पॉल रेफेल यांच्या जागी दुसऱ्या अंपायरचा शोध घेत आहेत.
ऑस्ट्रेलियाची दारं बंद होण्याची भीती
भारतात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सर्वांत जास्त काळ लॉकडाऊनमध्ये राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये राहावे लागू नये म्हणून ऑस्ट्रेलियन सरकार दक्षता घेत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकार देशाच्या सीमा सील करण्याच्या विचारात आहे. सरकारने हे पाऊल उचलण्याअगोदर आपण मायदेशी गेलेले बरं, असा विचार ऑस्ट्रेलियन खेळाडू, समालोचन आणि प्रशिक्षक करत आहेत.